“जर सावरकरांना भारतरत्न दिला तर सावरकरांचा नाही तर भारतरत्नाचा सम्मान वाढेल”असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे माजी सचिव आणि माय होम इंडिया संस्थेचे संस्थापक सुनील देवधरयांनी केले.
ते माय होम इंडिया या संस्थेकडून दिल्लीतील आकाशवाणी भवन येथील रंगभवन सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री डॉ.एल.मुरुगन, माय होम इंडियाचे संस्थापक आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर,राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे माजी अध्यक्ष अरुण हलदर, संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज कीर्तनकार ह.भ.प शिरीष महाराज मोरे,माय होम इंडिया दिल्लीचे अध्यक्ष बलदेवराज सचदेवा आदी मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित आहे.यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास ही संकल्पना घेऊन २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प केला आहे. विकसित भारताच्या संकल्पात भारतातील शेवटच्या नागरिकाची प्रगती झाली पाहिजे. तरच भारत विकसीत होईल असे केंद्रीय मंत्री मुरुगन म्हणाले. या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एससी,एसटी,ओबीसी युवक,महिला,शेतकरी आणि गरिबांसाठी विविध योजना आखून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.सावरकरांना जर भारतरत्न दिले तर भारतरत्नाचाच सन्मान होईल. सावरकरांनी कधी कुठल्या पुरस्कारासाची अपेक्षा केली नव्हती पण मला विश्वास आहे की नरेंद्र मोदी सरकार त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात सावरकरांना भारतरत्न जरूर देईल.केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश त्यांच्याकडे आशेने पाहत आहे
असे माय होम इंडियाचे संस्थापक आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी मत व्यक्त केले. तसेच महापुरुष कोणत्याही राज्याचे जातीचे धर्माचे नसून ते समाजाला प्रेरणा देणारे असतात. म्हणून आपण एकत्र येऊन यांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करणे गरजेचे आहे. यातूनच सामाजिक सलोखा निर्माण होईल .त्यांनी पश्चिम बंगालमध्ये हिंदू वर होणाऱ्या अत्याचार यावर चिंता व्यक्त केली. यासाठी समाजाने एकत्र येण्याची भावना व्यक्त केली.
उत्तर पश्चिम दिल्लीचे लोकसभा खासदार योगेंद्र चांडोलिया यांनी सुनील देवधर यांच्या ईशान्य भारतातील कार्याचे महत्त्व विषद केलं. लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला.
महापुरुष हे कोणत्या जातीचे नसतात महापुरुषांना जातीमध्ये गुंतवू नका असे अनुसूचित जाती आयोगाचे माजी अध्यक्ष अरुण हलदर यांनी सांगितले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ११वें वंशज शिरीष महाराज मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने लोकमान्य टिळकांचे आणि अण्णा भाऊ साठे यांचे कार्य उभे राहिले असे मत व्यक्त केलं. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या भारतमातेच्या या दोन थोर सुपुत्रांचा एवढा भव्य कार्यक्रम राष्ट्रीय राजधानीत आयोजित केल्याबद्दल त्यांनी सुनील देवधरांचे अभिनंदन केले. माय होम इंडिया दिल्लीचे अध्यक्ष बलदेव राज सचदेवा यांनी ‘माय होम इंडिया’ च्या कार्याची माहिती दिली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा प्रसून यांनी केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

